NHAIच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर भडकले नितीन गडकरी , नेमंक काय म्हणाले ?
पुणे : ‘ठेकेदार तुम्हाला चुकीची माहिती देऊन चुना लावतात. त्यांचे ऐकून तुम्ही मला चुकीची माहिती देऊन चुना लावत आहात,’ अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांसह उपस्थित ठेकेदारांना खडेबोल सुनावले. दिवेघाट ते लोणंद आणि पाटस ते पंढरपूर येथील पालखी महामार्गांचे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करा, असे आदेश देत गडकरी यांनी अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना चांगलेच धारेवर धरले.नितीन गडकरी विविध कार्यक्रमांसाठी पुणे दौऱ्यावर होते. त्यानंतर एका हॉटेलमध्ये ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी पालखी महामार्गांच्या विविध टप्प्यांच्या कामांचा आढावा घेतला. या वेळी प्रकल्प अधिकारी संजय कदम यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर ठेकेदारांच्या अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या. कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना केली. दिवेघाट ते लोणंद दरम्यानच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या कामासंदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर महामार्गाची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याबद्दल गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली.
पालखी महामार्गाचे लवकर उद्घाटन करायचे आहे. त्यासाठी आता संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी महामार्गांची कामे त्वरित पूर्ण करा. मार्चपर्यंत या महामार्गांची कामे पूर्ण झाली पाहिजेत,’ असे आदेश देताना ‘ठेकेदार तुम्हाला चुकीची माहिती देऊन चुना लावतात आणि तुम्ही मला तीच चुकीची माहिती देऊन चुना लावता,’ अशा शब्दांत गडकरी यांनी ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांना सुनावले. धर्मापुरी ते लोणंद हा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गातील चौथ्या टप्प्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे; तसेच लोणंद ते दिवेघाट हा महामार्ग ७५ टक्के पूर्ण झाला आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गातील पाटस ते बारामती आणि पुढे इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील काम अंत्यत संथगतीने सुरू आहे, अशी माहिती ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांनी दिली. त्या वेळी या दोन्ही पालखी महामार्गांचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना गडकरी यांनी दिल्या.
What's Your Reaction?








