जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या ...
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. त्याआधी जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. बुमराह पाठीच्या दुखापतीने त्रस्त असून सध्या तो त्याच्या पुनर्वसनासाठी एनसीएकडे रिपोर्ट करणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२५ च्या शेवटच्या आणि पाचव्या कसोटी दरम्यान बुमराहला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे बुमराह इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही उपलब्ध होणार नाही.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार एका सूत्राने सांगितले की, "बुमराह सध्या जखमी आहे आणि त्याच्या पुनर्वसनासाठी तो एनसीएकडे रिपोर्ट करणार आहे, त्यामुळे तो लवकरच बरा होईल अशी आम्हाला आशा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या निवडीबाबत फारशी खात्री नाही. त्याच्या फिटनेसचा विचार करून निवड समितीच याबाबत अंतिम निर्णय घेतील."
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारतीय संघाला २० फेब्रुवारीला दुबईमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून आपल्या मोहिमेची सुरुवात करायची आहे. पाकिस्तान विरुद्ध हाय व्होल्टेज सामना २३ फेब्रुवारीला होणार आहे ज्यामध्ये संघाला बुमराहशिवाय सामना खेळावा लागणार आहे. भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना २ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. अशा परिस्थितीत बुमराह उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. २ आणि ४ मार्चला दोन उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. तर अंतिम सामना ९ मार्चला होणार आहे. भारताला मोहम्मद शमीच्या दुखापतीचीही चिंता होती परंतु तो इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी उपलब्ध असल्याने तो चॅम्पियन ट्राॅफी खेळणार हे स्पष्ट झाल्याचे समजते.२०१७ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या आवृत्तीत, बुमराहने पाच सामन्यांमध्ये ५२.५० च्या सरासरीने चार विकेट घेतल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा शेवटचा गट सामना २ मार्चपासून न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले जातील, कारण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता आणि आयसीसीने हायब्रिड मॉडेलला सहमती दिली होती.
What's Your Reaction?








