शरद पवारांनी पुन्हा एकदा भर पावसात घेतली सभा; सांगलीत म्हणाले- काही वाटेल ते झाले तरी राज्यातील सत्ता पुन्हा फडणवीसांच्या हातात जाऊ देणार नाही !!
इचलकरंजी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज इचलकरंजीत महाविकास आघाडीचे उमेदवार मनद कारंडे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. या सभेत पावसाची हजेरी लागल्याने पुन्हा एकदा पवारांच्या २०१९ साली झालेल्या ऐतिहासिक सभेची सर्वांना आठवण झाली.भर पावसात झालेल्या सभेत शरद पवारांनी सांगितले की, राज्यात अनेक वेळा बोलायला उभा राहिलो तेव्हा पावसाला सुरूवात आणि अशाच पद्धतीने निवडणुकीचा निकाल देखील चांगला लागतो. राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत सत्ता कोणाच्या हातात द्यायचा हा निर्णय घ्याचा आहे. सध्या ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचा अनुभव काही चांगला नाही. त्यामुळे २० तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करा, असे आवाहन त्यांनी केले. या सभेत शरद पवार फार बोलले नसले तरी जेव्हा ते बोलण्यास उभे राहिले तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
त्याआधी शरद पवारांनी सांगलीत रोहित पाटील यांच्यासाठी सभा घेतली. राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला ४०० जागा हव्या होत्या. पण आम्ही तो प्रयत्न लोकसभा निवडणुकीत यशस्वी होऊ दिला नाही. आता विधानसभेच्या निवडणुकीत काही वाटेल ते झाले तरी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही हे आम्ही ठरवले आहे. त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आम्ही फक्त त्यासाठी निवडणूक महत्त्वाची मानत नाही. तर आमच्याकडे कार्यक्रम देखील आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे ते पैशांचा गैरवापर करत असल्याची टीका शरद पवारांनी केली.
What's Your Reaction?








