लाडक्या बहिणींना 'दे धक्का'! पाच लाख महिला अपात्र ....
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' जाहीर केली होती. या योजनेला महाराष्ट्रात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. तर महायुतीसाठी ही योजना गेमचेंजर ठरली आहे. प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होत आहेत. मात्र, आता या ऐतिहासिक योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाहीत, अशा पाच लाख महिलांना सरकारनं अपात्र ठरवलं आहे.
पाच लाख अपात्र लाडक्या बहिणी या योजनेच्या निकषात बसत नाहीत, अशा ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली. "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना! दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून वगळण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी घाईगडबडीनं या योजनेतील महिलांना पात्र ठरवण्यात आलं होतं. त्यावेळी सरकारनं निकष पाहिले नाहीत. सरसकट अर्ज दाखल केलेल्या महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. मात्र आता निवडणुकीनंतर नियम आणि निकष पाहिले जात आहेत. मग त्यावेळी निकष का नाही पाहिले गेले? असा संतप्त सवाल लाडक्या बहिणी विचारत आहेत. दुसरीकडं, आपण योजनेचा लाभ घेतल्यामुळं सरकार आपल्यावर कारवाई करेल, या भीतीनं ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत, अशा महिलांनी पैसे परत करण्यास सुरुवात केली. केवळ एका पुण्यामध्ये 75 हजार महिलांनी कारवाईच्या भीतीपोटी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'तील पैसे परत केले आहेत.
What's Your Reaction?








