देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री..., आदित्य ठाकरेंचा मोठा दावा !!
मुंबई : निवडणुकीनंतर भाजप आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणूक होताच बहुमतासाठी राजकीय समीकरण बदलणार असल्याची देखील चर्चा आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद आणि आम्हाला आता गरजही पडणार नाही, असे मोठे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. फडणवीसांच्या या विधानाचा आता उद्धव ठाकरेंचे पूत्र आमदार आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. 'आमच्यासाठी दार बंद करा, खिडक्या बंद करा. पण महाराष्ट्राने तुमच्यासाठी कायमचे दरवाजे बंद केले आहेत. आता देवेंद्र फडणवीस कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत,' असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी अलीकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मला मुख्यमंत्री बनण्याची लालसा उरलेली नाही, आपण आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्ट केले होते. यावर देखील आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नक्कीच नाहीत. कोण जाणार गुजरात हिताचं बोलणाऱ्या या लोकांकडे? कोण जाणार आहे महाराष्ट्र द्वेष्टा या लोकांकडे?' तसेच 'तुम्ही आमच्यासाठी खिडक्या बंद करा दरवाजे बंद करा. पण फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत.' असे आदित्य ठाकरे म्हणाले.
What's Your Reaction?








