"मुसलमानही RSS मध्ये येऊ शकतात, पण फक्त 'या' अटीवर"; स्वयंसेवकाच्या प्रश्नावर मोहन भागवतांचं स्पष्ट उत्तर !!
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) हे चार दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर होते. रविवारी (६ एप्रिल) वाराणसीमधील लाजपत नगर येथील शाखेमध्ये ते गेले होते. त्यावेळी जातभेद संपवण्याबाबत, पर्यायवरण आणि अर्थव्यवस्थेवर ते बोलत होते. यादरम्यान मोहन भागवत यांना एका स्वयंसेवकाने, मुसलमान आरएसएसमध्ये (RSS) येऊ शकतात का? असा प्रश्न केला होता. यावर मोहन भागवत यांनी एक मोठे विधान केले आहे. नेमके काय म्हणाले जाणून घ्या.
मोहन भागवत यांचं काय उत्तर?
आरएसएसमध्ये भारतातील सर्वांचं स्वागत आहे. पण प्रत्येकासाठी एक अट असणार ती म्हणजे शाखेत सामील होणाऱ्या प्रत्येकाला 'भारत माता की जय' ही घोषणा किंवा नारा देताना मनात कसलाही संकोच वाटता कामा नये. त्यांना भगव्या ध्वजाचा आदरही असला पाहिजे, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. भागवत यांनी दिलेल्या या उत्तराची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे.आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे अनेक लोक असले तरी आपली संस्कृती सारखीच आहे. भारतातील सर्व धर्म, पंथ आणि जातीमधील लोकांचे प्रत्येक शाखेत स्वागत असल्याचंही मोहन भागवतांनी म्हटलंय. वाराणसी दौऱ्यावर असलेल्या भागवतांनी ५ एप्रिलला काशीच्या वैदित विद्वानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारत देशाला विश्वगुरू बनवण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार असल्याचं म्हणत विद्वानांशी संवाद साधला.दरम्यान, मोहन भागवत हे आज लखनौला रवाना होणार आहेत. ७ ते ८ एप्रिलपर्यंत ते लखनौमध्ये राहणार असून कानपूरला जातील. त्यानंतर ३० एप्रिलला काशीमध्ये होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी परत येणार आहेत. आताच गेल्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथे संघ मुख्यालयामध्ये मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात आले होते. नरेंद्र मोदी आता निवृत्ती घेणार असल्याने ते भागवत यांना भेटायला आले असल्याचं विरोधी नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र भाजप नेत्यांनी हा दावा फेटाळून लावला.
What's Your Reaction?








