माझा बाप भिकारी नव्हताच, मुलीचा टाहो, शिर्डीतील चार भिक्षेकरींच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट !!

Apr 10, 2025 - 09:43
 0  47
माझा बाप भिकारी नव्हताच, मुलीचा टाहो, शिर्डीतील चार भिक्षेकरींच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट !!

शिर्डी/अहिल्यानगर : शिर्डीत काही दिवसांपूर्वी भिक्षेकरी धरपकड मोहिमेत ताब्यात घेतलेल्या ५० जणांपैकी चौघा जणांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. संतप्त नातेवाईकांनी दोघा जणांचे मृतदेह अँब्युलन्सद्वारे थेट शिर्डी पोलीस ठाण्यासमोर आणून एकच आक्रोश केला. आमची माणसं परत द्या, आम्हाला न्याय द्या अशी मागणी यावेळी मयतांच्या नातेवाईकांनी केली आहे. तर माझा बाप भिकारी नव्हताच असे म्हणत मयताच्या मुलीने पोलीस ठाण्यासमोर टाहो फोडला. त्यामुळे शिर्डी पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाच्या या कारवाईला वेगळेच वळण लागले आहे. भिकारी समजून सामान्य लोकांना सुद्धा डांबून ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय.

शिर्डी पोलिस, साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगर परिषदेच्या वतीने महत्वाच्या सण उत्सव काळात साई भक्तांना त्रास होऊ नये, यासाठी भिकाऱ्यांची धरपकड मोहीम राबवली जाते. रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई करत ५० जणांना ताब्यात घेऊन कोर्टाच्या संमतीने त्यांची रवानगी विसापूर येथील भिक्षेकरी सुधारगृहात करण्यात आली होती. त्यातील दहा जणांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र यातील अशोक बोरसे, इसाक शेख, प्रवीण घोरपडे आणि सारंधर वाघमारे या चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यासह दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून चार जणांनी रुग्णालयातून पलायन केले आहे.

मयतांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत प्रशासनाने मारहाण करत त्यांना रुग्णालयात बांधून ठेवल्याचा आणि जेवण-पाणी न दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप केलाय.. मयतांपैकी इसाक शेख आणि सारंधर वाघमारे यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अँब्युलन्सद्वारे थेट शिर्डी पोलीस ठाण्यासमोर आणून एकच आक्रोश केला. माझा बाप भिकारी नव्हताच असे म्हणत मयत सारंधर वाघमारेंच्या मुलीने पोलीस ठाण्यासमोर टाहो फोडला.आमची माणसं भिक्षेकरी नसताना प्रशासनाने त्यांना उचलून नेले आणि उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. जसे उचलून नेले तसेच परत आणून द्या अशी मागणी मयतांच्या नातेवाईकांनी केली आहे. तर दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर प्रशासनाविरोधात लढा उभारण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे..दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, तर घटना घडल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow