अतीवृष्टीमुळे, पुरामुळे खचलेल्या, बुजलेल्या विहीरीच्या !!
दैनिक जागर मराठी
नांदगाव खंडेश्वर (ता. प्र.) : सन 2025-26 मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे तसेच पुरामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहीरी खचल्या व बुजल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे व शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता या विहीरीची दूरुस्ती करणे अवघड झाले आहे. त्यामुळे विहीरींच्या दुरुस्ती अभावी सिंचन व्यवस्था ठप्प पडली आहे. या सर्व बाबीचा विचार करुन व विहीरीच्या मोठया नुकसानीचा आढावा घेऊन शासनाने मग्रायो-2025 प्र.क्र. 79 मग्रारो-5 दि. 13.10.2025 रोजी विहीरीच्या दुरुस्तीकरीता अर्थसहाय्य देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला. त्यानुसार निर्णय जाहीर होताच बऱ्याच शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करुन आवश्यक कागदपत्र सादर केलीत. परंतु सदर अर्जावर पंचायत समिती स्तरावरुन अजूनपर्यंत काहीही कार्यवाही झाली नाही. शासनाकडून स्पष्ट आदेश देऊनही प्रशासनाने शेतकऱ्याकडून आलेल्या प्रस्तावावर काहीही कार्यवाही केली नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांनी खासदार अमर काळे यांचेकडे तक्रारी केल्यात. शेतकरी आधीच नापिकीच्या व कर्जाच्या चक्रव्युहात अडकला असतांना रब्बी हंगामाच्या अपेक्षेने पुढील तयारी सुरु झाली. परंतु रब्बी हंगामाकरीता सिंचनाकरीता विहीरीची दुरुस्ती न झाल्याने सिंचनाची अडचण येत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीची त्यांच्या सध्याची नापिकी व शेतमालाचे भावाने त्रस्त शेतकऱ्यांची स्थिती पाहता खासदार अमर काळे यांनी त्यांचे तक्रारीची तात्काळ दखल घेतली. त्यामुळे शासनाकडून प्राप्त अर्थसहाय्याच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या प्राप्त अर्जावर तात्काळ पंचनामे करुन अर्थसहाय्य वितरीत करावे व ज्यांचे पंचनामे झाले आहे त्यांचे सुध्दा अर्थसहाय्य वितरीत करण्यात यावे व शेतकऱ्यांनी सादर केलेले अर्ज तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाने निधी वितरणाकरीता संबंधीत कार्यालयाकडून मागविण्यात यावे अशी मागणी खासदार अमर काळे यांनी त्यांचे पत्रान्वये जिल्हाधिकारी अमरावती व वर्धा यांचेकडे केली आहे.
What's Your Reaction?








