'छावा'मधील 'आया रे तूफान' गाण्यात मराठी कलाकारांना ओळखलं? अंगावर शहारा आणेल मराठमोळ्या गायिकेचा आवाज
२०२५ या वर्षातील ज्या बिग बजेट सिनेमाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे, तो सिनेमा म्हणजे 'छावा'. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. रीलिजपूर्वी सिनेमाचा ट्रेलर, संगीत आणि तगड्या कलाकारांची फौज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली.काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'जाने तू' गाणे प्रदर्शित झाले होते आणि आता 'आया रे तूफान' हे गाणे रीलिज झाले आहे. काही तासांमध्ये युट्युबवर या गाण्याने लाखो व्ह्युव्हज मिळवले. विकी आणि रश्मिका या चित्रपटाचे आकर्षण आहेतच, याशिवाय चित्रपटातील मराठी कलाकार चर्चेत आले आहेत. सिनेमाचा ट्रेलर आणि 'जाने तू'मध्ये काही मराठी कलाकार दिसले होते, आता 'आया रे तूफान' या गाण्यामध्येही त्यांची झलक दिसली. तुम्ही ओळखलं का की, कोण आहेत हे कलाकार?गाण्यात असे दिसते आहे की, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणारा विकी कौशल शत्रूशी दोन हात करतो आणि महाराजांना त्यांच्या मावळ्यांची साथ मिळते. महाराजांच्या मावळ्यांच्या भूमिकेत हे मराठी कलाकार दिसत आहेत. सुरुवातीला चिखलाने माखलेल्या लूकमध्ये अभिनेता शुभंकर एकबोटे दिसतोय, त्यानंतर छत्रपतींसोबत चालताना संतोष जुवेकर, आशिष पाथोडे या कलाकारांची झलक दिसली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे दृश्य विलोभनीय पद्धतीने दाखवण्यात आले आहे. या दृश्यामध्ये किरण करमरकर दिसून आले. तर महाराज जेव्हा सिंहासनावर विराजमान होतात, तेव्हा जयजयकार करताना संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी हे कलाकार दिसतायंत. संतोष 'छावा'मध्ये रायाजींची भूमिका साकारणार असून महाराज जेव्हा सिंहासनावर बसतात तेव्हा रायाजी खूप भावुक झाल्याचे दाखवण्यात आले, त्यांच्या डोळ्यात पाणी तरळते. याशिवाय या चित्रपटात मनोज कोल्हटकर, आस्ताद काळे, नीलकांती पाटेकर हे मराठी कलाकारदेखील आहेत.या गाण्याचे आणि व्हिडिओचे खूपच कौतुक होते आहे. यातील प्रत्येक क्षण भावुक करणारा आहे, अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. या गाण्याबद्दलची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, ए. आर. रहमान यांच्यासह 'आया रे तूफान' हे गाणे मराठमोळी गायिका वैशाली सामंतने गायले आहे. रहमान यांचा आवाज जादुई आहे, तर वैशालीचा आवाज अंगावर शहारा आणतो. 'छावा' सिनेमाचे संगीत रहमान यांचेच आहे.
'आया रे तूफान'चा गीतकारही मराठीच आहे. मराठमोळ्या क्षितीज पटवर्धनने इर्शाद कमिल यांच्यासह हे गाणे लिहिले आहे. रहमान यांच्यासोबत क्षितीजचा हा पहिलाच प्रोजेक्ट असल्याने त्याने आभार व्यक्त करणारी एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली.
What's Your Reaction?








