घाणेरडं काही बोलत नाही आणि अशी कॉमेडी पसंत नाही' सध्याच्या विनोदाबद्दल अशोक सराफ यांचं स्पष्ट मत !!

Mar 29, 2025 - 10:06
 0  35
घाणेरडं काही बोलत नाही आणि अशी कॉमेडी पसंत नाही' सध्याच्या विनोदाबद्दल अशोक सराफ यांचं स्पष्ट मत !!

मुंबई - सध्याच्या काळात विनोद हा एक वादाचा मुद्दा बनला आहे. एखाद्याच्या विनोदाने कधी कुणाच्या भावना दुखावल्या जातील, हे काहीच सांगता येत नाही. मात्र, एक काळ असा होता जेव्हा विनोदी कलाकार प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करायचे. दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांसारख्या दिग्गजांनी आपल्या निखळ विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. पण, आता मात्र तसं चित्र राहिलेलं नाही. आता विनोदाने भावना दुखावल्या गेल्याचं पाहायला मिळतं. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांनी आताच्या आणि आधीच्या विनोदाबद्दल भाष्य केलं आहे.

अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांचा 'अशी ही जमवाजमवी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अशोक सराफ यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान अशोक सराफ म्हणाले की, 'आम्ही जी कॉमेडी करतो ती लोकांना पटेल का? या विचारानेच करतो. निदान मी तरी करतो. हे लोकांना पटणार आहे किंवा नाही याचा विचार करावाच लागतो. कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत आणि एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आज मी जे करत आहे ते काही लोकांना आवडत नसेल सुद्धा किंवा काही लोक करतात ते मलासुद्धा आवडणार नाही, असं होऊ शकतं. त्यामुळे ते एकमेकांना आवडू शकेल, हा अंदाजच असतो.'

'हा अंदाज खरा ठरवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आपल्याकडून केला जातो आणि तो करायलाही पाहिजेच असं मला वाटतं. आम्ही बाकी कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही. भूमिका आणि पात्राचा विचार अधिक केला जातो. तुमची भूमिका किंवा तुमचं पात्र काय म्हणत आहे? हे जास्त महत्त्वाचं असतं. त्या पात्राला अनुसरून तुमची कॉमेडी असली पाहिजे. एखाद्या गंभीर भूमिकेसाठी काहीतरी वेगळीच कॉमेडी असेल तर त्याला काही अर्थ नसतो. आपल्याबरोबर कोण आहे हेसुद्धा विचारात घेतलं पाहिजे. त्याला योग्य वाटेल अशी कॉमेडी झाली पाहिजे. हे फार विचारपूर्वक केलं जातं. कॉमेडी इतकी सोपी नाही. लोकांना वाटतं की, काय कॉमेडी सहज केली जाते. पण तसं नाही. लोकांना हसवणं फार कठीण आहे आणि सतत हसवणं हेही कठीण आहे. तसंच कॉमेडीचा प्रभाव शेवटपर्यंत ठेवणं हे त्याहून कठीण आहे. त्यामुळे कॉमेडी विचाराने आणि लोकांना विचारात घेऊनच केली पाहिजे.' असं अशोक सराफ पुढे म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow