'कर्जमाफीच्या पैशांनी लग्न, साखरपुडा', अजित पवार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर संतापले !!
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कान टोचल्याची माहिती समोर आली आहे. माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आला होता. त्यांच्या या वक्तव्याबाबत अजित पवार यांनादेखील प्रश्न विचारले जात होते. तसेच राज्यभरात माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात निदर्शन केली जात होती. शेतकरी कर्जमाफी कधी करणार? असा प्रश्न माणिकराव कोकाटे यांना विचारला असता, शेतकरी कर्जमाफीने लग्न आणि साखरपुडा करता, असं म्हटलं होतं. त्यांच्या याबाबतच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर कोकाटे यांना आपल्या वक्तव्याप्रकरणी जाहीरपणे माफी मागावी लागली. यानंतर अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचल्याचं वृत्त 'एबीपी माझा'ने खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. नुकतंच त्यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल वक्तव्य केलं. "शेतकरी कर्जमाफीच्या पैशांचा एक रुपयाही शेतात गुंतवणूक करत नाहीत. तुम्हाला पाईपलाईला, जलसिंचनाला, शेततळ्याला पैसे, सगळ्या गोष्टींना पैसे. शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, ह्याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडा करा, लग्न करा", असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. याच वक्तव्यावरुन अजित पवारांनी त्यांचे कान टोचल्याची माहिती आहे.
अजित पवार कोकाटेंवर संतापल्याची माहिती
राज्य मंत्रिमंडळाची दर मंगळवारी बैठक पार पडते. या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री मुंबईत येतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची आणि महत्त्वाच्या नेत्यांची अजित पवार यांच्या 'देवगिरी' निवासस्थानी दर मंगळवारी आढावा बैठक पार पडते. त्यामुळे आजही नित्य नियमाने अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक आयोजित होती. या बैठकीला माणिकराव कोकाटे हे अर्धा तास उशिराने गेले. त्यामुळे अजित पवार त्यांच्यावर संतापल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासूनच्या पक्षाच्या जनता दरबाराला कोकाटे यांनी अनुपस्थिती लावण्यावरुनही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना पक्षाला अडचणीत आणतील, अशी वक्तव्ये करु नका, अशी समज दिली आहे. कोकाटे यांनी याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. "आमचे ओएसडी आणि पीए मुख्यमंत्रीच ठरवत असल्याने आमच्या हातात काही राहिलेलं नाही, असं वक्तव्य करत माणिकराव कोकाटे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती". त्यांच्या या वक्तव्याचीदेखील त्यावेळी चर्चा झाली होती.
What's Your Reaction?








