उद्धव ठाकरेंचा सवाल, “मोदी तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला का?”

May 11, 2024 - 05:46
 0  80
उद्धव ठाकरेंचा सवाल, “मोदी तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला का?”

सुभाष आहेर/ छत्रपती संभाजीनगर

 छत्रपती संभाजीनगर:-

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. मोदींनी माझा पक्ष फोडला, माणसं फोडली तरीही त्यांना माझी भीती वाटते आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. तसंच ज्यांना नकली म्हणता त्यांनाच कसा काय डोळा मारता? असाही उल्लेख उद्धव ठाकरेंनी भाषणात केला.

 काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“नरेंद्र मोदी, तुम्ही माझा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं. माझी माणसं फोडली तरीही तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती वाटते? मग उद्धव ठाकरे बरा आहे की लोकांमधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भरकटले आहेत. आज एक अहवाल आला आहे त्यात सांगितलं आहे की मुस्लिमांची लोकसंख्या वाढली. त्यात आम्ही तुमचं कौतुक करायचं का? तुम्हाला मतं तरी कुणाची हवी आहेत?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

 महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघू देणार नाही

“पंतप्रधान मोदी जी भाषा वापरत आहेत ती त्यांना शोभा देत नाही. माझ्या हिंदुस्थानात, माझ्या महाराष्ट्रात अशी भाषा खपवूनच घेतली जात नाही. पंढरपूरच्या वारीतही फुगड्या वगैरे खेळून नंतर एकमेकांच्या पायाला हात लावून माऊली म्हणायची परंपरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेमकं काय करायचं आहे त्यांनी ठरवावं. आजपर्यंत त्यांनी सगळं फोडलं. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. तरीही कधी मला डोळा मार, कधी पवारांना डोळा मार असं चाललं.एके ठिकाणी सांगायचं नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी. नंतर हे असे डोळे मारायचे, म्हणायचं आजा मेरी गाडी मे बैठ जा. हे इतके घाबरलेत की त्यांना कळलं आहे की हे आता दिल्ली परत बघत नाहीत. महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघू देणार नाही हे लक्षात ठेवा.” असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

 मोदीजी तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला आहे का?

आम्ही कधीही तुमच्या कौटुंबिक, खासगी जीवनाबाबत बोललो नव्हतो, तसं बोलण्याची इच्छाही नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधान होण्यासाठी माझी सही घेतली होती. गुरुवारी तुम्ही जे बोललात त्यासाठी तुम्हाला क्षमा करु शकत नाही. माझ्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणालात. मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणालात. तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला आहे का? जसं अदाणीला सगळं विकलं तसं तुम्ही आत्माही सैतानाला विकला का?

बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल याचा खरंच विचार तुम्ही करा. २०१४ मध्ये माझ्या शिवसेनेचा पाठिंबा तुम्ही पंतप्रधानपदासाठी घेतला होता. मी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मी मुंबईत परतलो तेव्हाच मला एकनाथ खडसेंकडून का कळवलंत की आपली युती तुटली? तेव्हा मी युती तोडली नव्हती. २०१४ मध्ये तुम्ही युती तोडली तेव्हा काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला हा विचार तुम्ही केला नाहीत का?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

 बाळासाहेबांच्या आत्म्याची चिंता तुम्ही करु नका

“२०१९ मध्ये बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाह यांनी मला वचन दिलं होतं की अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटायचं. मग ते वचन तुमच्याकडून मोडलं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला काय वाटलं होतं? परवा माझ्याबद्दल म्हणालात की ऑपरेशनचा सल्ला तुम्हीच मला दिला. हे सगळं झूठच आहे. पण रोज चौकशी करत होतात हेदेखील मोदींनी सांगितलं. मग तेव्हा माझ्या हातापायांची हालचाल होत नव्हती,

आता मी तुमच्यासमोर उभा आहे ते लोकांच्या प्रेमामुळे उभा आहे. मी हालचाल करु शकत नव्हतो त्याचवेळी माझ्या पक्षात तुम्ही तुमच्या आत्ताच्या पाव उपमुख्यमंत्र्यांकडून गद्दारीची बीजं पेरलीत. चांगलं चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलंत तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला काय वाटलं असेल? त्यामुळे तुम्ही त्यांच्या आत्म्याची चिंता करु नका. मुंबईत रोड शो करणार आहेत, आले ना रस्त्यावर?” असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow